जिल्हा जळगाव शहरातील महामार्ग होणार ‘अतिक्रमणमुक्त’; महामार्गावरील वाहनांना 7 दिवसांचा ‘अल्टिमेटम’ महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वात प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत होऊन प्रदूषण मोठ्या प्रमाणात त्यामुळे अतिक्रमण काढणे अत्यंत महत्त्वाचे महापौर दीपमाला काळे

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा लावण्यात आलेल्या वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी कडक पावले उचलली आहेत. महामार्गावरील वाहने हटवण्यासाठी संबंधित वाहनधारकांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. खेडी ते खोटे नगर दरम्यानचा महामार्ग पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार महापौरांनी व्यक्त केला आहे.बुधवारी महापौरांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त धनश्री शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, ‘नही’चे अधिकारी राहुल पाटील आणि अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर उपस्थित होते. महामार्गाचा काही भाग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (नही) हद्दीत असल्याने, 1 एप्रिलपासून महापालिका, ‘नही’ आणि वाहतूक पोलीस संयुक्तपणे वाहने हटवण्याची मोहीम राबवणार आहेत. महामार्गालगत भरणारे कार आणि दुचाकींचे बाजार 1 एप्रिलपासून पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या मदतीने हटवले जातील.शहरात पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी 30 मार्चपासून रस्त्यांवर पिवळे आणि पांढरे पट्टे आखले जाणार असून पार्किंग स्पॉट निश्चित केले जातील. फेरीवाल्यांना रस्त्यावरून हटवून त्यांना मनपाच्या मोकळ्या जागांवर ‘खाऊगल्ली’ विकसित करून दिली जाणार आहे. नागरिकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने महामार्गावरून स्वतःहून काढून घ्यावीत. रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा 1 एप्रिलपासून जप्तीची कठोर कारवाई अटळ आहे.तसेच शहरातील इतर अतिक्रमण देखील लवकरच पूर्ण उचलण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.त्यांना पर्यायी जागा ठरवून दिली जाणार आहे.”











