ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS जिल्हा जळगाव तालुका भुसावळात 16 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू; वडिलांनी केली उपचार पद्धतीच्या चौकशीची कारवाईची मागणी


भुसावळ, प्रतिनिधी गोपी अण्णा दि. 30 ऑगस्ट 2026 : भुसावळ शहरातील १६ वर्षीय मुलीला पोटात अचानक तीव्र दुखू लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीचे वडील संतोष सोनवणे यांनी केली आहे.याबाबत संतोष सोनवणे (वय 41, रा. रूपवते हाउसिंग सोसायटी, भुसावळ, ) यांनी दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची मुलगी नेहा संतोष सोनवणे (वय 16 वर्षे) ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती. दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजता नेहाने पोट दुखत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर ते कामावर जाण्यासाठी निघाले.दरम्यान, ते कामावर असताना पत्नीचा फोन आला. नेहाचे पोट खूप दुखत असल्याचे पत्नीने सांगितले. त्यामुळे संतोष सोनवणे हे घरी आले. सुमारे 10:30 वाजता त्यांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. संबंधित ठिकाणी रुग्णालय बंद असल्याने पुढे तिला भुसावळ तहसीलदार कार्यालयासमोरील श्री. हरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भुसावळ येथे दुपारी सुमारे 1 वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले.रुग्णालयात डॉ. गायत्री विनोद चौधरी यांनी मुलीवर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान मुलीची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीच्या अहवालानुसार तिच्या पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही गाठ दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून काढता येईल आणि त्याबाबत फारशी चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.मात्र उपचार सुरू असतानाच परिस्थिती गंभीर बनली. निवेदनानुसार, दुपारी सुमारे 3:15 वाजता नेहाचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.संतोष सोनवणे यांनी आपल्या निवेदनात मुलीच्या मृत्यूबाबत संबंधित रूग्णालयातील उपचार पद्धतीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.दरम्यान, 16 वर्षीय मुलीला सकाळी पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याने या घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेमका मृत्यू कशामुळे झाला, उपचारादरम्यान कोणती वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाली आणि उपचाराची प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली का, याबाबत चौकशीनंतरच स्पष्टता होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button