उघड्यावर कचरा टाकल्यास थेट दंड करा,’प्लास्टिक’साठी वेळप्रसंगी दुकाने सील करा आरोग्याच्या विषयात हलगर्जीपणा चालणार नाही जळगाव सिटीच्या महापौर दीपमाला काळे यांचे कडक निर्देश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात अस्वच्छता पसरू नये आणि नाले-गटारी तुंबू नयेत यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (8 जून) मनपामध्ये आरोग्य विभाग, मलेरिया विभाग आणि कंत्राटदार ‘बिव्हिजी’ कंपनीची संयुक्त तातडीची बैठक घेतली. या बैठकीत महापौरांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, शहरातील अस्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक व कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.कचरा टाकणाऱ्यांवर आणि प्लास्टिक विक्रेत्यांवर थेट कारवाई बैठकीत बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी उघड्यावर कचरा टाकला, तर कोणाचीही गय न करता त्यांना थेट दंड करा. खाद्यपदार्थ विक्रेते, उसाचा रस विक्रेते उघड्यावर कचरा टाकत असतील, तर त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करा. जेथे ‘कचरा टाकू नका’ असे फलक आहेत तिथेच लोक कचरा टाकतात असे चित्र मला दिसून आले आहे, हे आता खपवून घेतले जाणार नाही. शहरातील प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात निर्देश देताना त्या म्हणाल्या, ज्या ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिकच्या थैल्या विकल्या जातात, त्यांच्यावर थेट कारवाई करा आणि वेळप्रसंगी दुकाने सील करा. प्लास्टिकचे ग्लास, थर्माकोल यावर बंदी आहे याबाबत स्पष्ट सांगून द्या. प्लास्टिकमुळेच गटारी तुंबतात, त्यामुळे बायोडिग्रेडेबल आणि कापडी थैल्या वापरण्यासंदर्भात पुन्हा एकदा जनजागृती करा.माझं जळगाव, स्वच्छ जळगाव विशेष सूचना वेळेवर कचरा उचलणे शहरात कचरा झाडल्यानंतर तो तात्काळ उचलला गेला पाहिजे, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी.नियोजन तपासणे घंटागाड्यांचे शेड्युल व्यवस्थित आहे का? हे तपासा. प्रत्येक वॉर्डात स्वच्छता राहिलीच पाहिजे. गटारी व रस्ते साफ झाली पाहिजे. रोजच्या रोज वाहनांद्वारे कचरा उचलला गेला पाहिजे मलेरिया विभागाचा आढावा या वेळेला मलेरिया विभागाचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू व साथीचे आजार पसरणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. फॉगिंग मशीन, फवारणीचे औषधे व इतर साधनसामग्रीचा या वेळेला महापौरांनी आढावा घेतला. पावसाळ्याची पूर्वतयारी पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरले किंवा नाले तुंबले, अशी कारणे मला ऐकायची नाहीत. आरोग्य विभागाबाबतच्या जुन्या तक्रारी आता निकाली निघाल्या पाहिजेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ ऑफिसमध्येच न बसता ‘फिल्ड’वर दिसले पाहिजे.भ्रष्टाचार आणि दबावाविरुद्ध कडक इशारा आरोग्य विभागात कोणताही गैरप्रकार चालणार नाही. या विभागांवर माझे बारीक लक्ष आहे. जर कोणी पैसे घेत असेल, तर त्यांच्यावर धडक कारवाई केली जाईल,” असा इशारा महापौरांनी दिला. तसेच, कर्मचारी हजेरीबाबत तक्रारी असल्यास किंवा कोणी धमक्या देत असल्यास तात्काळ आपल्याला कळवण्याचे सांगत, कर्मचाऱ्यांनी कुठल्याही दबावाखाली काम न करता आरोग्य विभाग व बीव्हीजी विभागाने परस्परांशी समन्वय ठेवून शहराच्या आरोग्य विकासासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.या महत्त्वपूर्ण बैठकीला आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य अधीक्षक समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, मलेरिया विभागातील सुधीर सोनवाल, वीर दहीयेकर, रवींद्र निकम, तसेच ‘बिव्हिजी’ कंपनीचे अधिकारी विनोद रेड्डी, प्रशांत पवार, योगेश पाटील, श्रीकांत हंगे आदी उपस्थित होते.















