पावसाळ्यापूर्वी जळगाव महापालिका ॲक्शन मोडमध्ये; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ‘पीडब्ल्यूडी’ ला पाठविले पत्र जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांची डागडूजी करा महापौर दीपमाला काळे यांच्या बैठकीनंतर शहर अभियंत्यांचे लेखी आदेश

अग्रवाल हॉस्पिटल परिसर, क्रीडा संकुलातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील पाणी साचण्याच्या गंभीर ठिकाणांवरून आक्रमक पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीनंतर व त्यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन स्वतंत्र पत्रे पाठवून पावसाळ्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.अग्रवाल हॉस्पिटलजवळ पाण्याचा निचरा करा; ‘नही’ला पत्र जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील अग्रवाल हॉस्पिटल (चौफुली) परिसरामध्ये पावसाळ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या समस्येबाबत महापालिकेकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. याची दखल घेत महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना लेखी पत्र पाठवले आहे. सदर बाब राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित असल्याकारणाने या जागी साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी आपल्या विभागाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना कराव्यात, असे या पत्रात बजावण्यात आले आहे. महामार्गावरील या प्रमुख चौकात पाणी साचून वाहतुकीची कोंडी किंवा अपघात होऊ नये, यासाठी ‘नही’ने त्वरित काम करणे गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील गटरचे काम पूर्ण करा दुसऱ्या पत्रामध्ये महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर बोट ठेवले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील दुकानांपासून ते राम होंडा शोरूमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत आरसीसी गटर बांधण्याचे काम मंजूर असून त्याचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) देखील निर्गमित झालेले आहेत काही दिवसांपूर्वीच पीडब्ल्यूडीचे संबंधित अभियंता, कंत्राटदार आणि महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन संयुक्त पाहणी देखील केली होती. मात्र, पाहणी होऊनही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. पावसाळा तोंडावर असल्याने हे काम रखडल्यास परिसरात मोठे जलमय संकट उभे राहण्याची आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी महापालिकेने पत्राद्वारे केली आहे.महापौर दीपमाला काळे यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग या दोन्ही महत्त्वपूर्ण आणि प्रलंबित विषयां संदर्भात जळगाव शहर महानगर पालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० मे रोजी महापालिकेत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनुसार आणि महापौरांच्या निर्देशानुसारच महापालिका प्रशासनाने ही पत्रे पाठवून संबंधित यंत्रणांना वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आता नही’ आणि ‘बांधकाम विभाग’ यावर किती तत्परतेने काम करतात, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.











